अबब..! सोलापूर बाजार समितीत १३५२ गाड्या कांदा आवक; किलोला फक्त २-३ रुपयाचा दर

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्याना प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे भाव खूप कमी असतानाही अनुदानाच्या आशेने बुधवारी (ता. २९) तब्बल १३५२ गाड्या कांदा आला होता. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहणार आहे.
Onion news
Onion news esakal

सोलापूर : राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे भाव खूपच कमी असतानाही अनुदानाच्या आशेने मागील पाच दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत साडेचार हजार गाड्या कांदा आला. बुधवारी (ता. २९) तब्बल एक हजार ३५२ गाड्यांची आवक नोंदवली गेली.

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे लेट खरीप हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे आता बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. निर्यातीसंदर्भात निश्चित धोरण नसल्याने जानेवारीपासून कांद्याचे दर पडत गेले. सध्या कांद्याला प्रतिकिलो अडीच ते तीन रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्यांना नाशवंत कांद्याचा साठा करून परवडत नाही. त्यामुळे भाव कमी झाले तरीदेखील बाजार समितीत कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे.

सोलापूर बाजार समितीत अक्षरश: कांदा ठेवायला जागा नाही. मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री आणलेला कांदा दुसऱ्या दिवशी (बुधवारी) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उतरवणे सुरुच होते. अनुदानाच्या आशेने शेतकरी खराब, कच्चा कांदा देखील विक्रीसाठी आणत असल्याची स्थिती बाजार समितीत पहायला मिळाली. कांद्याला प्रतिक्विंटल अडीचशे ते तीनशे रुपयांचाच दर मिळाला.

जानेवारीतील शेतकऱ्यांनाही मिळावे अनुदान

डिसेंबर २०२२ पर्यंत कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दीड हजारांपर्यंत दर मिळत होता. त्यानंतर जानेवारीत तोच दर बाराशे ते आठशे-नऊशे रुपयांपर्यंत उतरला. त्यामुळे राज्य सरकारने जानेवारीमध्ये बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, त्यासंदर्भात बऱ्याच शेतकरी संघटना मात्र मागणी करताना कुठे दिसत नाहीत.

लिलाव सकाळी दहा वाजल्यापासून

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बीड, लातूर, सोलापूर, पुणे, कर्नाटक यासह इतर काही जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येतो. आता अनुदानाच्या आशेने शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत. एक हजारांवर गाड्यांची आवक आलेली असतानाही बाजार समितीकडून सकाळी दहा वाजता लिलाव सुरु केले जात आहेत. त्यामुळे लिलावासाठी खूपच वेळ लागत असून त्यात आवक जास्त असल्याने दर देखील खूपच कमी मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com