राज्यातील 77 विशेष अध्यापकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
औरंगाबाद - अपंग एकात्म शिक्षण योजनेंतर्गत राज्यात विद्यादान करणाऱ्या 77 अंध शिक्षकांना मार्च 2017 पासून वेतनच मिळाले नाही. परिणामी, त्यांची आर्थिक कोंडी झाली असून, स्वतःचा आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरित द्यावे आणि इतर समस्या सोडवाव्यात, अशी मागणी या शिक्षकांनी शालेय शिक्षण सचिवांकडे केली आहे. मागणीची पूर्तता केली नाही तर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंध शिक्षकांनी निवेदनात म्हटले आहे की, 77 विशेष शिक्षक राज्यातील अपंग विद्यार्थ्यांना अपंग एकात्म शिक्षण योजनेंतर्गत अध्यापनाचे काम करीत आहेत; पण मार्च 2017 पासून त्यांना वेतन मिळाले नाही. हे थकीत वेतन व नियमित वेतन; तसेच समायोजन समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व वित्त विभागातील अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे संबंधित फाइल दोन वर्षांपासून कुठल्याही ठोस निर्णयाविना फिरत आहे. राज्यात अपंगांच्या कल्याणासाठी अपंग कल्याण धोरण घोषित करण्यात आले आहे; मात्र शासन अपंग विद्यार्थी आणि विशेष शिक्षकांकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. मागणीची पूर्तता केली नाही, तर बुधवारी (ता. 30) हुतात्मादिनी मंत्रालयासमोर आत्मदहन करू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यावर माधव गोरे (लातूर), विजय कदम (जळगाव), शुभाष चिने (लातूर), विजया पाटील (धुळे), पंजाब पाटील (अमरावती) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
|