मिरज - राज्यात वर्षभरात जवळपास 27 हजार शिबिरांत सुमारे 16 लाख जणांनी रक्तदान केले आहे. महाराष्ट्राची ही कामगिरी देशात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. 97.54 टक्के एवढ्या विक्रमी प्रमाणात हे रक्तदान झाले आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांत 332 पेढ्या रक्तसंकलन करतात. गडचिरोली, हिंगोली, जालना, रत्नागिरी, सातारा, सिंधुदूर्ग आणि वाशीम जिल्ह्यांनी 100 टक्के उद्दिष्टपूर्ती केली.
एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे रक्तसंक्रमण परिषदेने शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था, महाविद्यालयातील एनएसएस प्रतिनिधी, कार्पोरेट हाउस यांची स्वेच्छा रक्तदान समिती स्थापन केली. त्यांच्यामार्फत शिबिरे घेऊन रक्ततुटवड्यावर मात केली जाते.
असा होतो रक्ताचा वापर
स्वैच्छिक रक्तदानामार्फत मिळालेले रक्त अशक्त माता, बालके, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करुग्ण, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताच्या अन्य आजारांसाठी वापरले जाते.
लोकसंख्येच्या एक टक्का संकलन
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार लोकसंख्येच्या एक टक्का रक्तसंकलन आवश्यक असते. राज्याची लोकसंख्या 12 कोटी आठ लाख आहे. बारा लाख रक्तपिशव्यांचे संकलन आवश्यक होते. गेल्या वर्षात सोळा लाख पिशव्यांचे संकलन करून उद्दिष्टापेक्षा कितीतरी अधिक कामगिरी राज्याने केली आहे.
राज्याने रक्तसंकलनात पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी केली आहे. रक्तदान चळवळीत समाजाचा वाढता सहभाग चांगल्या जनजागृतीचे फलीत आहे. आरोग्यमंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, संचालक यांच्यासह चळवळीतील कार्यकर्त्यांचे हे यश मानावे लागेल.
- डॉ. अरुण थोरात, सहायक संचालक, महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषद.
36 राज्ये - सरासरी 71 टक्के.
महाराष्ट्र - सर्वाधिक 97 टक्के
सिक्कीम - 96 टक्के
त्रिपुरा - 95 टक्के
तमिळनाडू - 93 टक्के
चंडिगड - 91 टक्के
रक्तपेढ्या
मुंबई - 60
पुणे - 33,
ठाणे - 23
सांगली व सोलापूर - प्रत्येकी 17
नाशिक - 16
नगर व नागपूर - प्रत्येकी 14
कोल्हापूर - 13
जळगाव - 10
|