पावसाअभावी 164 तालुके चिंतेत

Rain
Rain

नाशिक - राज्यातील 355 पैकी 164 तालुक्‍यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने ग्रासले असताना नाशिक, नंदूरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा आणि चंद्रपूर हे जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.

गेल्या महिनाखेरच्या नैसर्गिक आपत्तीमुळे एक लाख 41 हजार 255 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, भात, कांदा, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, भुईमूग, मका, वाटाणा, घेवडा, पावटा या पिकांचा समावेश आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 539, नगरमधील 34 हजार 798, पुण्यातील 27 हजार 42, कोल्हापूरमधील नऊ हजार, सांगलीमधील 3400, साताऱ्यामधील साडेचार हजार असे एक लाख आठ हजार 279 हेक्‍टर क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावाने बाधित झाले आहे. 26 तालुक्‍यांत 25 ते 50, 138 तालुक्‍यांत 50 ते 75, 128 तालुक्‍यांत शंभर, तर 63 तालुक्‍यांत शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. एक जून ते 28 सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सरासरी पर्जन्यमान 1117.8 मिलिमीटर इतके असून प्रत्यक्षात 839.9 मिलिमीटर, म्हणजेच 77.4 टक्के पाऊस झाला आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत 75 ते 100, तर ठाणे, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

खरिपाच्या उत्पादनात घट शक्‍य
राज्यातील एक कोटी 40 लाख 69 हजार हेक्‍टर खरिपाच्या क्षेत्रापैकी एक कोटी 39 लाख 40 हजार हेक्‍टरवर म्हणजेच, 99 टक्के पेरणी झाली. उसाच्या एक कोटी 49 लाख 74 हजार हेक्‍टरपैकी एक कोटी 41 लाख 31 हजार हेक्‍टरवर म्हणजेच 94 टक्के उसाची लागवड झाली आहे.

राज्यातील बहुतांश भागांतील पिकांच्या वाढीसाठी पाऊस, पाण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, पावसाअभावी वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट शक्‍य आहे. भात फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. नाचणी वाढीपासून फुटवे फुटण्याच्या, मका दाणे भरण्याच्या, बाजरी दाणे पक्वता ते काढणीच्या, ज्वारी पोटरी ते दाणे भरण्याच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. काही भागांत बाजरीची काढणी सुरू झाली आहे. सोयाबीन शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. कापसाला फुले, बोंडे लागली असून, काही भागांत बोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहेत. भुईमुगाच्या आऱ्या सुटणे, शेंगा भरणे ते शेंगा पक्वता अशा अवस्था आहेत. तूर वाढ ते फुलोऱ्यात आहे.

नैसर्गिक आपत्तीने बाधित क्षेत्र
यवतमाळ - 46 हजार 649
चंद्रपूर - 11 हजार 161
नांदेड - 71 हजार 349
जळगाव - 254
गडचिरोली - 9,642
नंदूरबार - 615
धुळे - 858
सातारा - 318
सांगली - 409
(आकडे हेक्‍टरमध्ये)

कीड-रोगांचा प्रादुर्भाव
भात - गादमाशी, निळे भुंगेरे, पिवळी खोडकीड व कडाकरपा, मानमोडी
सोयाबीन - पाने खाणारी अळी, चक्री भुंगा, खोडमाशी व उंट अळी
कापूस - शेंदरी बोंड अळी व रस शोषणारी कीड
भुईमूग - हुमणी
ऊस - लोकरी मावा व हुमणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com