मुंबई - राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव वाढला असून, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. नागरिकांनी सर्दी, ताप, घसा दुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर 24 तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केले आहे.
राज्यात ठिकठिकाणी स्वाइन फ्लू संशयित 16 हजार रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाने साथरोग नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. या वेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली. पुढील दोन दिवसांमध्ये हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाइन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
|