
Kaneri Math : 'कुणाच्या तरी अज्ञानातून..'; गायींच्या मृत्यूबाबत सिद्धगिरी मठ समितीचा मोठा खुलासा
कोल्हापूर : कणेरीतील 'सुमंगलम' पंचमहाभूत लोकोत्सवाला (Sumangalam Panchamahabhuta Festival) गालबोट लागलं आहे. मठावरील गोशाळेतील सुमारे 53 गायींचा फूड पॉइसननं मृत्यू झाला आहे. सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातील शिळ अन्न खायला दिल्यानं गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागाकडून दिलीये.
आता या दुर्दैवी घटनेनंतर उत्सव समिती सिद्धगिरी मठ यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ इथं सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावादरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडं आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे, असं सिद्धगिरी मठ उत्सव समितीनं (Siddhagiri Math Utsav Samiti) म्हटलंय.
कणेरी मठात अनेक वर्षांपासून हजारो गाईंचा सांभाळ
कणेरी मठाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आली आहे. भाकड व भटक्या गाईंना कोणी वाली नाही, अशा जनावरांनाही कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचं पालन पोषण केलं जातं. त्यामुळं ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसंच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधं देऊन त्यांचं प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांसाठीही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारांवरील निष्ठा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचं प्रदर्शन आणि स्पर्धाही घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टीकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे, असंही समितीनं म्हटलंय.
'कुणाच्या तरी अज्ञानातून ही गोष्ट घडली आहे'
अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीनं अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईल. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये, इतकीच विनंती आहे, असं समितीनं निवदेनात म्हटलंय. मठानं नेहमी पत्रकार बांधवांचा सन्मान केला आहे, तसंच पत्रकार बांधवांनीही नेहमी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमात आपलं बहूमुल्य योगदान दिलं आहे व नेहमीच अमूल्य सहकार्य केलेलं आहे व करत आहेत. तरी आज कोणी खोडसाळपणे पत्रकार बांधवांच्या बाबतीत गैरप्रकार केला, त्याबद्दल आम्ही व्यवस्थापनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं उत्सव समिती श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंथन मठ कणेरी (जि. कोल्हापूर) यांनी नमूद केलंय.
'गाईंच्या मृत्यूचा आकडा फुगवून सांगितला'
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह देशभरातून दररोज ७ ते ८ लाख लोक मठावर येत आहेत. सुमारे ६५० एकर परिसरावर बघेल तिकडं लोकच लोक आहेत. अशा वेळी गुरुवारी दत्तगुरूंची गाई म्हणून गाईला काही उत्सवात सहभागी होणाऱ्या काही भाविक वृत्तीच्या लोकांनी अज्ञानानं गाईंना अन्न घातलं. यात 12 गाई दगावल्या. इतर सर्व गाईंच्यावर यशस्वी उपचार करण्यात यश आलं. आज घडीला एक ही गाई वैद्यकीयदृष्ट्या असक्षम नाही. सगळ्या गाई बऱ्या झाल्या आहेत हे मठाच्या प्रशासनाचं यश आहे, तरीही गाईच्या मृत्यूचा आकडा फुगवून सांगितला जात आहे, यावरून मठाला बदनाम करण्यात काही मंडळी किती अग्रेसर आहेत हे लक्षात येतं. तरी लोक सूज्ञ आहेत, त्यांना काही विघ्न संतोषी मंडळींनी फुगवलेला आकडा व मठाचा द्वेष लगेच लक्षात येतोच. त्यामुळं आजही मठावर दररोज लाखो लोकांची संख्या वाढत आहे.
-उत्सव समिती श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंथन मठ कणेरी (जि. कोल्हापूर)