पुढील हंगामात राज्यात 30 टक्के उत्पादन घटण्याचा "इस्मा'चा अंदाज
माळीनगर (जि. सोलापूर) - गेली सलग दोन वर्षे देशात विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे भारताची सक्षम साखर निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण झाल्याचे वाटते. आगामी 2019-20 चा गाळप हंगाम लक्षात घेता 70 लाख टन निर्यातीची मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केंद्र सरकारकडे केली आहे.
साखरेचे विक्रमी उत्पादन व मंदपणे होणारी विक्री यामुळे साखर उद्योगावर गंभीर ताण आला आहे. साखरेला सध्या तीन हजार 100 ते तीन हजार 120 रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. गेल्या वर्षभरात त्यात बदल झाला नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. सध्या साखर विक्री अवघड झाली आहे. कारखान्यांचे पैसे अडकले आहेत. त्यावर व्याज सुरू आहे. महाराष्ट्रात मागील हंगामात झालेल्या विक्रमी उत्पादनामुळे देशातील साखर उत्पादन 2018-19 मध्ये 328 लाख टनांपर्यंत पोचले. मागील हंगाम सुरू होताना देशात 104 लाख टन साखर शिल्लक होती.
त्यासह 2018-19च्या हंगामात तयार झालेली 328 लाख टन साखर मिळून देशात 432 लाख टन साखर साठा झाला. देशांतर्गत साखरेची वार्षिक गरज 260 लाख टन व 30 लाख टन झालेली निर्यात गृहीत धरली तर 132 लाख टन विक्री न झालेली साखर अंगावर घेऊन पुढील हंगाम सुरू होईल, असे "इस्मा'चे म्हणणे आहे.
70 लाख टन साखर निर्यातीची मागणी केंद्राकडे केली आहे. पुढील काही दिवसांत ती मान्य होण्याची अपेक्षा आहे. केंद्राचे साखर निर्यात धोरण अंतिम झाल्यावर चीनच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत होईल. चीनचे जुलैमध्ये साखर आयात करण्याचे नियोजन असल्याने केंद्राने त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा.
- रोहित पवार, अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
|