शिवसेनेत बंडखोरी करून दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाला आहे. याआधी ठाण्यामध्ये शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. ही घटना ताजी असतानाच ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने आलेत. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या शाखेवर ताबा मिळवल्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आपली भूमिका मांडली. प्रसारमाध्यमांशी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, ही शाखा शिवसेनेची आहे. ही शाखा आमची आहे. याठिकाणी आमचे लोक बसून काम करतात. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. धर्मवीर आनंद दीघे यांच्यानंतर ठाण्याचा संपूर्ण कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला आहे असं त्यांनी म्हंटलं आहे.
शाखेचं कुलूप तोडण्यावर नरेश म्हस्के म्हणाले की, “हे पाहा कुलूप तोडायचा काही प्रश्नच नाही. या शाखेतून व्यवस्थित काम सुरू होतं. त्यांनीच (ठाकरे गटाने) चुकीच्या पद्धतीने हे कुलूप लावलं. त्यांना आम्ही चावी मागितली होती, परंतु त्यांनी चावी दिली नाही. त्यामुळे आम्ही कुलूप तोडलं आहे.
याठिकाणी ठाकरे गटाचे एक-दोन लोक बसायचे. आम्ही कधीही त्याच्यात अडथळा आणला नाही. पण आमच्याच घरात बसायला त्यांची (ठाकरे गट) परवानगी मागावी लागत असेल, तर आम्ही हे कधीही सहन करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला अन्यायाविरोधात वाचा फोडण्याची शक्ती दिली आहे असंही नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.
“निवडणूक आयोगाकडून शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. तीही कसबा पोटनिवडणुकी पुरतीच परवानगी दिली होती. आता सुप्रीम कोर्टातील सुनावणी होईपर्यंत त्यांच्याकडे ते नाव असणार आहे. त्यांना शिवसेना नाव लावायची परवानगी नाही,” असंही पुढे नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.