वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबला असून, या दडपशाहीच्या विरोधात महात्मा गांधी यांनी अनुसरलेल्या अहिंसात्मक मार्गाने विरोध करण्याचा संकल्प करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सेवाग्राम येथील कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
कॉंग्रेस कार्यकारिणीची ऐतिहासिक बैठक सेवाग्राम येथील महादेव भवनात पार पडली. या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेस कार्यसमितीचे जवळपास 50 सदस्य हजर होते. या वेळी दोन ठराव संमत करण्यात आले. यानंतर कार्यकारिणीच्या सदस्यांना राहुल गांधी यांनी अर्धा तास मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सेवाग्राम येथे कार्यकारिणीच्या बैठकीची भूमिका विशद केली. 'महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त ही बैठक सेवाग्राममध्ये घेण्याचे औचित्य आहेच; परंतु यासोबतच आज देशाची स्थिती 70 वर्षांपूर्वी ज्या मूल्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसजन व लोकांनी लढा दिला, त्याच मूल्यांच्या संरक्षणासाठी लढा देण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्याने महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले असे होत नाही; तर महात्मा गांधी यांचे विचार कृतीत उतरले पाहिजेत. आज सत्तेत असलेले लोक केवळ देखावा म्हणून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात, परंतु त्यांची कृती मात्र अगदी त्याविरोधात असते. यामुळेच आज देश महात्मा गांधी यांचे 150वे जयंती वर्ष साजरे करीत असताना आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने लाठीमार केला,'' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रत्येक घटकात असंतोष
समाजातील प्रत्येक घटकामध्ये आज असंतोष आहे. या सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता कॉंग्रेसजनांनी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. यासाठी महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याची आज आवश्यकता आहे. यासाठी लवकरच कॉंग्रेसतर्फे अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
|