मुंबई - जिल्हा परिषदांत कॉंग्रेससोबत इतर समविचारी पक्षांशी आघाडी करून सत्ता स्थापन करावी. राज्यातल्या पंधरा ते सोळा जिल्हा परिषदांत आघाडीची सत्ता येऊ शकते, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आज पक्षाच्या मोजक्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. या वेळी राज्यभरातल्या निवडणूक निकालांचा त्यांनी आढावा घेतला.
महापालिकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला असला, तरी जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये पक्षाची कामगिरी समाधानकारक असल्याचे या बैठकीत समोरे आले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर लढताना अनेक जिल्हा परिषदांत सत्ताधारी भाजप व शिवसेनेपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांची सत्ता आघाडीला मिळू शकते, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. आजच्या बैठकीत राज्य सरकार व मुंबई महापौरपदावरून शिवसेना व भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाचेही पडसाद उमटले; मात्र त्या दोन्ही मित्रपक्षांमध्ये समेट होण्याचीच अधिक शक्यता असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची रात्री एकत्रित बैठक झाली. त्यात ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करून सत्ता स्थापन करणे शक्य आहे, त्यावरच चर्चा झाली. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांचा जिल्हाध्यक्ष व तर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा उपाध्यक्ष असे सूत्र ठरले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रभारी यांची राज्यव्यापी बैठक उद्या (ता. 4) बोलावली आहे.
|