'उद्योगात यशासाठी त्रिसूत्री महत्त्वाची'

'उद्योगात यशासाठी त्रिसूत्री महत्त्वाची'

पुणे- कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची उत्पादने जागतिक दर्जाची असली पाहिजेत, त्याचबरोबर उत्पादनांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी उद्योगाचे विस्तारीकरण महत्त्वाचे आहे, अशी यशाची त्रिसूत्री प्रसिद्ध उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी राज्यातील कृषी उद्योजकांना सांगितली. निमित्त होते ‘सकाळ ॲग्रोवन''तर्फे आयोजित बिझनेस एक्सलन्स ॲवार्डस वितरण सोहळ्याचे!  

पुण्यात झालेल्या या रंगतदार सोहळ्यात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रमोद चौधरी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. बियाणे, खते, कीटकनाशके, जैविक उत्पादने, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया, शेती यांत्रिकीकरण, रोपवाटिका, सेंद्रिय उत्पादने, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांना चौधरी यांच्या हस्ते टाळ्यांच्या कडकडाटात ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्डस’ प्रदान करण्यात आले.  

चौधरी म्हणाले, ‘‘उद्योजकांना विविध अडचणींमुळे पहिल्या टप्प्यात उद्योगाचा विस्तार म्हणजे स्केल कमी ठेवावा लागतो. मात्र, उद्योगाला समृद्धी व स्थिरता देण्यासाठी विस्तारीकरण महत्त्वाचे आहे. जास्त ग्राहकांपर्यंत तुमचे दर्जेदार उत्पादन गेले पाहिजे. त्यासाठी थोडी तरी निर्यात करायला हवी. त्यातूनच उद्योगाची प्रगती होते. आपल्या सीमा तोडून पुढे पाहत उद्योगाचा विस्तार करणे हे उद्योजकाचे कर्तव्यच आहे. मात्र, तुमचा उद्योग शाश्वतपणा, विस्तारीकरण आणि जागतिक श्रेणीचा अंगिकार करणारा असावा. शेतकरी व शेती उद्योजक हे एकाच गाडीची दोन चाके आहेत. शेतीची प्रगती दोघांच्या परिश्रमातून होते आहे. त्यामुळे शेतीला हातभार लावणाऱ्या उद्योजकांचा हा सन्मान मला  मोलाचा वाटतो.’’

कृषी उद्योगांचेही व्यासपीठ  
‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘कृषी उद्योजकांच्या अडचणी ‘ॲग्रोवन’ने गेल्या वर्षभरात सतत मांडल्या. कृषी खात्यामधील अडवणुकीविरोधात वृत्तमालिका प्रसिद्ध केल्या. त्याचा लाभ कृषी उद्योजक व शेतकऱ्यांनाही होतो आहे. हे व्यासपीठ शेतकऱ्यांबरोबरच  कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचेही आहे.’’

प्रक्रिया उद्योगावर कर नको - पवार 
पवार या वेळी म्हणाले की, ‘‘उद्योजकांना प्रेरणा मिळावी व त्यांचा उत्साह वाढावा हा उद्देश या पुरस्कार उपक्रमामागे आहे. कृषी उद्योजकांची शेतीमधील भूमिका मोलाची आहे. म्हणून कृषी उद्योजकांच्या अडचणी ‘ॲग्रोवन''च्या माध्यमातून आम्ही बेधडकपणे मांडल्या आहेत. माझ्या मते कृषी प्रक्रिया उद्योगावर कर लावू नयेत. कारण शेतीमालाचे काढणीपश्चात नुकसान टाळायचे असेल तर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहनच द्यायला हवे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com