मुख्यमंत्र्यांना विरोध होऊ नये म्हणून अजितदादांनी रद्द केला अक्‍कलकोट दौरा ! शनिवारी रात्रीत गाठली बारामती

1Ajit_20Pawar_20Uddhav_20Thackeray_20New.jpg
1Ajit_20Pawar_20Uddhav_20Thackeray_20New.jpg

सोलापूर : राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17) पंढरपूर दौरा केला. कुंभार घाट दुर्घटना व तेथील नुकसानीची पाहणी करुन ते सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. दुसऱ्या दिवशी ते अक्‍कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी करणार, असा नियोजित दौरा होता. मात्र, मुख्यमंत्री सोमवारी (ता. 19) सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याने त्याच त्या भागात पहाणी दौरे करताना मदतीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून अजित पवारांनी अक्‍कलकोट दौरा केलाच नाही. शनिवारी (ता. 17) रात्री ते बारामतीला रवाना झाल्याची चर्चा आहे.

पंढरपूर तालुक्‍यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असून अक्‍कलकोट तालुक्‍यात भाजप व कॉंग्रेसला मानणारे लोक भरपूर आहेत. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौरा केला आणि अक्‍कलकोट दौरा मुख्यमंत्र्यांसाठी सोडला, असा सूर आता निघू लागला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे अशक्‍य असल्याचे वक्‍तव्य केले. त्यामुळे विरोधक व शेतकरी आक्रमक होऊन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यास अडथळा निर्माण करतील, असाही अंदाज वर्तविण्यात आला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा नियोजित पंढरपूर दौरा मंदिरे न उघडण्याच्या निर्णयामुळेही रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. 


हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात 
हातातोंडाशी आलेली पिके व नुकताच लागवड केलेला कांदा, ज्वारीच्या पेरणीसाठी केलेली शेतीची मशागत परतीच्या पावसात वाहून गेली. शेतात चार- पाच दिवस पाणी असल्याने उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले, तर काही शेतकऱ्यांची जनावरांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोनामुळे राज्याचा कारभार सहा महिन्यांपासून कर्ज काढून सुरु असल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांची निराशा झाली. त्याचे भांडवल करुन विरोधक आक्रमक होतील, असा सावध पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौरा रद्द करुन अक्‍कलकोट दौरा करण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह स्थानिक आमदार, माजी आमदार उपस्थित आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांना ठोस मदतीच्या आश्‍वासनाची प्रतीक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यासोबत असलेल्या कोणत्याही मंत्र्यांनी त्यावर भाष्य केलेले नाही. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दुपारी पावणेतीन वाजता प्रसार माध्यमांशी बोलणार असून त्यात मदतीची नेमकी काय घोषणा करणार, नुकसानग्रस्तांना कधीपर्यंत मदत मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com