अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत की नाशिकमध्ये? बैठकीत वादळी चर्चा

Akhuil Bhartiy Marathi Sahitya Sammelan
Akhuil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत की नाशिकमध्ये घ्यावे, यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. ‘राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज का बुलंद करायचा नाही’, हा मुद्दा लावून धरीत मुंबई आणि पुण्यातील सदस्यांनी दिल्लीसाठी आग्रह धरला. परंतु त्यावर काहीच निर्णय झाला नाही. बैठकीत आज केवळ स्थळ निवड समितीची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबाद येथील कार्यालयात पार पडली. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, प्रा. उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. प्रतिभा सराफ, (मुंबई), प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार (पुणे), विलास मानेकर, (नागपूर), प्रदीप दाते, (वर्धा), गजानन नारे, (नागपूर) आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाशिक येथे छोटेखानी साहित्य संमेलन घ्यावे, अशी चर्चा सुरू झाल्यावर पुणे आणि मुंबईतील सदस्यांनी दिल्लीच्या प्रस्तावाचा विचार करावा, असा सूर लावून धरला. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जा मिळण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील आहेत. हा प्रस्ताव दिल्लीत पडून आहे. त्यामुळे छोटेखानी संमेलन घ्यायचे असेल, तर दिल्लीत घ्यावे, असे मत सदस्यांनी मांडले. मात्र, ठाले पाटील यांनी स्थळ निवड समितीची निवड करीत नाशिकला भेटीची तारीखही ठरवून टाकली. त्यांच्या मनमानीबद्दल काही सदस्यांनी त्यांना सुनावून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक हे कुसुमाग्रजांचे गाव आहे, तिथे छोटे नव्हे; तर भव्य संमेलन घ्यावे, असा मुद्दाही सदस्यांनी मांडला. तसेच कोरोना काळात संमेलन गरजेचे आहे का, घ्यायचेच असेल, तर राज्य सरकार त्यासाठी परवानगी देणार का, असा प्रश्‍न काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर ठाले पाटील यांनी, संमेलन घेण्याबाबत सरकारला पत्रव्यवहार करून मार्गदर्शन घेऊ, असे उत्तर दिले. त्यामुळे सरकारकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत स्थळ पाहणीला अर्थ नसल्याचे मत काही सदस्यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले. 

ठालेंचा कल नाशिककडे?
साहित्य संमेलन स्थळ निवड समिती सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोशाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते प्रकाश पायगुडे, यांची निवड करण्यात आली. ही समिती नाशिक येथे स्थळ निवडीसाठी ७ जानेवारीला भेट देणार आहे. औरंगाबाद येथे ८ जानेवारीला स्थळ निवड समितीची बैठक होणार असून, या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन कोठे होईल याची शिफारस महामंडळ करील, असे महामंडळाने जाहीर केले आहे. मात्र, पुण्यातील सरहद संस्थेने दिल्लीत संमेलनाचा प्रस्ताव दिला आहे. तेथे स्थळ निवड कधी जाणार याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण महामंडळाने दिलेले नाही.

सरकारचा पैसा नको; पण संमेलन दिल्लीत घ्या!
महामंडळाला ३१ मार्चपूर्वी संमेलन घ्यायचे आहे. कारण सरकारच्या ५० लाख रुपयांचा ते विचार करीत आहेत. दिल्लीत संमेलन घेतले, तर सरकारची रक्कम आम्हाला नको. संमेलनाचा सर्व खर्च आम्ही उभा करू; परंतु मराठीच्या भल्यासाठी या वर्षी संमेलन दिल्लीत घ्यावे, अशी भावना संजय नहार यांनी व्यक्त केली.

मोठे मन दाखवा
‘सरहद’चे संजय नहार म्हणाले, महाराष्ट्र स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे, मराठी भाषाविषयक अनेक बाबी दिल्लीत प्रलंबित आहेत. त्यासाठी यंदा दिल्लीत संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे नाशिक येथील संमेलनासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांनी मोठे मन करून दिल्लीत संमेलन घेण्याचे मान्य करावे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com