मुंबई - युतीचा शेवटचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊ, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अन्य नेत्यांना टोला लगावला. लवकरात लवकर चर्चा सुरू न झाल्यास निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
"मातोश्री' या ठाकरे यांच्या निवासस्थानी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्या वेळी त्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन नेते मिळून चर्चा करतील. अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेऊ, असे त्यांनी सांगितले. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जिल्हा पातळीवर युतीचा अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जागावाटपाऐवजी पारदर्शक कारभारावर युतीची चर्चा होईल, अशी भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी घेतली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अथवा मुख्यमंत्री बोलले तर बघू, असे उत्तर उद्धव यांनी दिले. राज ठाकरे यांनी महापालिकेत भाजप हा आमचा शत्रू असेल, असे म्हटल्याबद्दल विचारले असता "शिवसेनेबद्दल अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत' असा चिमटा उद्धव यांनी काढला.
|