नागपूर : तपास यंत्रणांनी अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) कारवाई केल्यानंतर त्यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. पण, हा राजीनामा घेणं मोठी चूक होती, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. विदर्भात शिवसेनेचं (Shivsena) शिवसंपर्क अभियान सुरू आहे. त्यानिमित्त संजय राऊत विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरात (Nagpur) बोलत होते.
ईडीने नवाब मलिकांवर (Nawab Malik) कारवाई केली असून सध्या नवाब मलिक कोठडीत आहेत. पण, अनिल देशमुख कोठडीत जाण्यापूर्वी त्यांचा राजीनामा घेतला, तर नवाब मलिकांचा का नाही? असा सवाल विरोधी पक्ष भाजपकडून विचारण्यात येतो. त्याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले, ''नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. ईडीने त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली आहे. आम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात घाई केली. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही सर्वात मोठी चूक होती.''
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. तपास यंत्रणा या सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. कुठल्याही राज्यात गैरवापर करून सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न करतात. तपास यंत्रणांचा मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणांच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. ममता बॅनर्जींच्या भाच्याला ईडीने चौकशीसाठी बोलावलं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय नागरिकाला ईडीचं भय दाखवलं. त्यांना वाटत असेल पण आम्ही दिल्लीसमोर अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा तर प्रश्नच सोडा, अशी टीका संजय राऊतांनी तपास यंत्रणांवर केली.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आग्रही -
ईडीकडून नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपने मलिकांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानातून मोर्चा देखील काढला होता. तसेच विधानसभेत देखील गदारोळ घातला. पण, राज्य सरकारने मलिकांचा राजीनामा घेण्यास नकार दिला. त्यांच्या जबाबदाऱ्या काढून दुसऱ्याला सोपविण्यात आल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.