नाशिक - राज्यात आणि देशात होणाऱ्या विविध निवडणुकांचे भाकीत खरे ठरल्याचा दावा अनेक ज्योतिष्यांतर्फे केला जातो. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समिती तर्फे "अचूक अंदाज वर्तवा आणि पारितोषिक मिळवा', हे आव्हान मात्र कुठल्याही ज्योतिषाने स्वीकारलेले नाही.
ज्योतिष्यामुळे अज्ञानी व भाबड्या लोकांत गैरसमज व अंधश्रद्धा निर्माण होतात. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अशा वृत्तीला ठाम विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज वर्तविण्यासाठी आव्हान दिले होते. मुंबईत 8 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन "अंनिस'तर्फे 21 लाखांचे पारितोषिक जाहीर केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे, यांनी 25 प्रश्नांची प्रश्नावली प्रसिद्ध करून ज्योतिष व ज्योतिषविषयक संस्थांना आव्हान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक हजाराचा डीडी प्रवेश शुल्कासह 20 मेपर्यंत रजिस्टर पोस्टाने आव्हान स्वीकारण्याचे आवाहन केले होते.
मात्र "अंनिस'चे आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. पुणे व मायणी संस्थेसह राज्यातील प्रमुख दोन ज्योतिष संस्थांना त्याविषयी अधिकृत प्रवेशिका आणि प्रश्नावली पाठवूनही कुणीही आव्हान स्वीकारले नसल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले.
|