मुंबई - महाराष्ट्राची समृद्ध साहित्य परंपरा पुढे नेणारी प्रतिनिधी म्हणून रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, असा विश्वास 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केला.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत "मनाला दार असतंच' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला डॉ. ढेरे उपस्थित होत्या; त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. ढेरे यांना पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले.
डॉ. ढेरे म्हणाल्या, की महाराष्ट्राची समृद्ध साहित्य परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली आहे असे मी मानते. मराठी साहित्यिक रसिकांनी यानिमित्ताने माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
संमेलनाच्या अध्यध्यपदी 18 वर्षांनी महिलेची निवड झाल्याबद्दल डॉ. ढेरे म्हणाल्या, ""साहित्याच्या व्यासपीठावर सर्वार्थाने दिशा देणारी किंवा समृद्ध करणारी व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठावर असावी. मग स्त्री असो वा पुरुष असो. तेथे साहित्य आणि दर्जा एवढाच निकष असावा, असे माझे प्रामाणिक मत आहे. स्त्री साहित्य कुठेच कमी नाही. अशा महिलांची प्रतिनिधी होण्याचा मान मिळाला याचा मला आनंद आहे.''
साहित्याच्या व्यासपीठावर सर्वार्थाने दिशा देणारी किंवा समृद्ध करणारी व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठावर असावी. मग स्त्री असो वा पुरुष असो. स्त्री साहित्य कुठेच कमी नाही. अशा महिलांची प्रतिनिधी होण्याचा मान मिळाला याचा मला आनंद आहे.
- अरुणा ढेरे, नियोजित संमेलनाध्यक्षा
|