आंबेडकरांनी महाआघाडीत यावे; युतीचा पराभव अटळ: चव्हाण 

Ashok Chavan
Ashok Chavan

धुळे : गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मतविभाजन झाले. त्यामुळे भाजप- शिवसेना युतीला फायदा झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 70 टक्के विखुरलेली गेलेली मते एकत्र आणायची असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे. मग युतीचा पराभव अटळ आहे. त्यासाठी सर्वजण एकत्र मोट बांधूया, असे जाहीर आर्जव कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे केले. त्यांनी केंद्र, राज्यातील भाजप सरकारांवर चौफेर फटकेबाजीही केली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज दुपारी साडेतीनला येथील "एसएसव्हीपीएस' कॉलेजच्या मैदानावर कॉंग्रेसची सभा झाली. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. तरीही राज्यात महाआघाडी व्हावी, असा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, अशी अपेक्षा असून तशी विनंती श्री. आंबेडकर यांना केली आहे. अन्यथा, त्याचा भाजपचा फायदा होण्याची शक्‍यता असेल. वंचित बहुजन आघाडीच्या जागेसंदर्भातील प्रश्‍न मान्य करायला तयार आहोत. त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. तसेच सीपीएम, शेकाप, राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना कॉंग्रेस आघाडीसोबत यायला तयार आहे, अशी पुस्तीही श्री. चव्हाण यांनी जोडली. 

लाज वाटली पाहिजे 
पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देशाचे जवान शहीद झाले. ही अतिशय दुःखद घटना आहे. तरीही भाजपने राजकीय फायदा उचलणे सुरू केले आहे. हा विषय जोरात वाजवावा म्हणजे कर्नाटकात 22 जागा येतील, असे येडीयुरप्पा म्हणतात. असे म्हणताना त्यांना लाज वाटली पाहिजे. सैनिकांची चिता जळते व "ते' लोकसभेच्या जागा मोजत आहेत, हे दुर्दैव असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. 

देश विकायचा बाकी 
भाजपप्रणीत केंद्र, राज्य सरकार घणाघाती टीका करत श्री. चव्हाण म्हणाले, की या सरकारांनी फक्त देश विकायचा बाकी ठेवला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तरी सरकारला चिंता नाही. खतांच्या दरासह महागाई वाढते आहे. शेतमालाबाबत फक्त घोषणा केली जाते. तरीही त्याची पूर्तता सरकारकडून नाही. त्यासाठी पैसे नाहीत असे ते म्हणत असतील तर अशा प्रकारचे भिकारी सरकार राज्यात, देशात नसावे, अशी कडवट टीका श्री. चव्हाण यांनी केली. संरक्षण राज्यमंत्री या ठिकाणचे (धुळे) आहेत, असे म्हणत "कसलं डिफेन्स आणि कसलं काय' त्यांना काही समजत की नाही माहीत नाही, अशी टीकाही श्री. चव्हाण यांनी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उद्देशून केली. लोकसभेसाठी कॉंग्रेस जो उमेदवार देईल त्याच्यामागे भक्कमपणे उभे राहा, एकोप्याने काम करा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी सभेतील कार्यकर्त्यांना केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com