मुंबई - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्तता दिली आहे. त्यांच्यात मुंबईतील तीन महाविद्यालयांसह राज्यातील एकूण पाच महाविद्यालयांचा समावेश आहे.
यूजीसीने माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालय, एम. एम. शाह महाविद्यालय आणि चर्चगेट येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय या मुंबईतील तीन महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा दिला आहे. त्याचप्रमाणे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आणि नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालय यांनाही स्वायत्तता दिली आहे. हा स्वायत्त दर्जा पाच वर्षांसाठी असेल. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांची संख्या मुंबईत 23 आणि राज्यांत 74 वर गेली आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक स्वायत्त महाविद्यालये असलेले देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने केलेल्या (नॅक) मूल्यांकनात 3.5 पेक्षा अधिक गुण मिळालेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचे धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील 36 महाविद्यालयांनी स्वायत्ततेची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी काही महाविद्यालयांना यापूर्वी स्वायत्तता देण्यात आली आहे.
|