पुणे : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला आहे. त्यावरून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यात पक्के आहे. पण, घोषणेनुसार करत काहीच नाही, असं ते म्हणाले. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे भाववाढीचे संकेत आहेत. त्यासाठी केंद्राची एक टीम काम करत असल्याचं त्यांनी सांगितले.
पुण्यात चेंबर ऑफ कॉमर्स उदयोगपतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच भाजपचा एक कार्यक्रम देखील होता. त्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यात पक्के आहे. घोषणा करून काहीही करत नाहीत. दिवाळी काळात केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. पण राज्य सरकारने काहीच केलं नाही. आता अर्थसंकल्पामध्ये देखील पेट्रोलमध्ये काही कर कमी केलेला दिसत नाही. मूलभूत सुविधा वाढावी अशी कुठलीच योजना महाराष्ट्र सरकारने आणली नाही. शेतकऱ्यांनी वीज कापणार नाही, असं कुठंच म्हटलं नाही, असं कराड म्हणाले. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील, असे सांगितले जात आहे. यावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. तसेच भाववाढ रोखण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक टीम काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकार ५ लाख उदयोगावर खर्च करणार आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाचपैकी चार राज्यांत भाजप निवडून आलंय. पण, त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे आताच सांगता येत नाही. येत्या निवडणुकीत भाजपच निवडून येणार आहे. हे महाविकास आघाडी सरकार गेलं, तरच महाराष्ट्राचा विकास होईल. त्यावेळी कुठलं सरकार आणायचं हे जनता ठरवेल, असं भागवत कराड म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.