मुंबई - लोकसभा निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघ परिवार हे देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय आणि आरबीआय या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांना उद्ध्वस्त करत सुटले आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपकडे कोणताही विकासाचा मुद्दा शिल्लक राहिला शिल्लक राहिला नाही, यामुळे त्यांना आता राम मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आणावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात याविषयी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लवकर व्हावी, यासाठी न्यायालयावर दबाव आणला जात आहे. म्हणूनच संघाकडून मंदिराच्या प्रश्नावर आंदोलनाची भाषा बोलली जात आहे. भाजपचे नेते, मंत्री हे उघडपणे आता राममंदिर या प्रश्नावर बोलत आहेत. परंतु या मंडळींनी काहीही केले तरी ही सुनावणी लवकर होणार नसल्याचे मुणगेकर म्हणाले.
भाजपला राममंदिराचा प्रश्न सोडवायचा नाही. केवळ तो प्रश्न आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरायचा आहे. म्हणूनच मागच्या चार वर्षांत भाजपला एकदाही राम मंदिराचा प्रश्न आठवला नाही. अपयश झाकून ठेवण्यासाठी भाजप आणि संघ हे देशातील जनतेचे ध्रुवीकरण करत असल्याचा आरोपही डॉ. मुणगेकर यांनी केला.
सीबीआय, आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेला केंद्र सरकार उद्ध्वस्त करू पाहत आहे, त्यांची स्वायतत्ता हिरावून घेण्यासाठी त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे त्या संस्थांचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि स्वायत्तता यांच्यावरच हल्ला केला जात आहे. नोटा बंदीच्या काळात मोदींनी अत्यंत महत्त्वाच्या रिझर्व्ह बॅंकेला विश्वासात घेतले नाही आणि नोटाबंदी देशातील जनतेवर लादली. यामुळे देशाचे आणि देशातील जनतेचे अतोनात नुकसान झाले असा दावाही केला.
|