मुंबई - कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलन आता तीव्र स्वरुपात करण्यात येत आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्याचवेळी स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांचा रस्ता अडवला. त्यानंतर महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, बारसूमध्ये असंतोष उफाळून आला आहे. मला सरकारला एवढच सांगायचं की, लोकांच्या जीवाशी खेळून आणि दडपशाहीने गप्प करून तुम्ही अशा पद्धतीने राजकारण करू शकत नाही. अशा पद्धतीने तुमचा पक्ष कोकणात वाढणार नाही. कोकणातील जनता चिकित्सक आहे.
या प्रकल्पाबाबत अनेकांनी वेगवेगळी मते मांडली आहे. भाजप म्हणतं की, तीन ते चार लाख कोटींचा हा प्रकल्प आहे. तसेच यातून एक लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल. मग त्यावर भाजपने खुलेआम चर्चा घडवावी, मी तिथं येतो, कोकणाचं अर्थकारण कस बदलणार, हे सांगावं, असंही जाधव म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कधीच बदलली नाही. उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितलं, की आम्ही जनतेच्या इच्छेबरोबर आहोत. नाणार प्रकल्प देवेंद्र फडणवीसांमुळे रद्द झाला. आता त्यांना कोकणाच्या जनतेविषयी प्रेम निर्माण झालं आहे, मग तेव्हा रद्द का केला? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी खूप आग्रह केला होता. त्यामुळे उद्धव यांनी बारसू येथील पूर्णपणे उजाड आणि मोकळी जागा सुचवली होती. केवळ केंद्राचा आग्रह असल्यामुळे ही जागा सुचवली होती. आता केंद्रातील आणि राज्यातील सत्ता भाजपकडे आहे. त्यांनी जनतेत जावून प्रकल्पाविषयी सर्व माहिती द्यावी. मात्र ते धाडस करत नाही, असंही जाधव म्हणाले.
दरम्यान भाजपला केवळ कोकणात पक्ष वाढवायचा आहे. राजकारण करायचं आहे.पण कोकणात भाजप पक्ष वाढणार नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.