‘एनआरसी’विरोधात ‘बिहार पॅटर्न’

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई - ‘सीएए’, ‘एनपीआर’ आणि ‘एनआरसी’ या कायद्यांबाबत संपूर्ण देशात सुरू असलेल्या वादाबाबत महाराष्ट्रातून आघाडी उभारली जाण्याची चिन्हे आहेत. हे प्रस्तावित कायदे देशवासीयांना उपयोगी ठरणारे आहेत की ताप देणारे, याचा विचार करा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले जाण्याचा विचार सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत पुढाकार घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.

दिल्लीतील घडामोडींनंतर या विषयाची संवेदनशीलता वाढली असल्याचे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे एकमत आहे. विश्‍वसनीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा ठाकरे यांचा मनोदय आहे. ‘एनपीआर’ आणि ‘एनआरसी’वर आक्षेप नोंदविणारे बिहार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पहिले राज्य ठरले असून, विधानसभेने एकमताने मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयाबाबत अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी सीएएला घबरण्याचे कारण नाही. एनआरसी महाराष्ट्रात लागू होणार नाही आणि एनपीआर ही जनगणना असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. दिल्लीवारीतील मोदी-शहा, तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भात तिन्ही घटकपक्षांची चर्चा झाली होती.

बिहार विधानसभेने केलेल्या ठरावानंतर नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका जवळपास सारखी असल्याचे शिवसेनेतील एका बड्या नेत्याने स्पष्ट केले. या विषयात भाजपेतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्‍यता प्रत्यक्षात येईल. उद्धव ठाकरे हे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही संपर्कात असतात. यानिमित्ताने चर्चेसाठी एकत्र मंच उभारला जाण्याची शक्‍यता आहे. तसेच, येत्या एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचीही यासंदर्भात चर्चा होईल. 

काँग्रेसचे दिल्लीत विचारमंथन 
दरम्यान, जनगणनेत सन २०१० च्या प्रारूपाप्रमाणेच प्रश्‍न विचारले जावेत, असा आग्रह धरायचा काय, यावर काँग्रेसने सर्व राज्यांतील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक दिल्लीत बोलावली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या बैठकीला महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष या नात्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांबाबत या वेळी सविस्तर चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com