नगर - लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने संघटनकौशल्यावर निवडणूक जिंकली.
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. काही मंत्र्यांचा अपवाद वगळता, कोणावरही आरोप झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी व खासदार सरोज पांडे यांनी रविवारी व्यक्त केला.
भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी पांडे आज येथे आल्या होत्या. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'विधानसभेत भाजपचे 122 आमदार आहेत. त्या जागांसह अन्य ठिकाणीही भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. युतीचा उमेदवार असेल, तेथेही भाजप कार्यकर्ते जिंकण्यासाठी जोर लावतील. अन्य पक्षांत भविष्य नसल्याने नेते, पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पक्षात येणाऱ्यांचे स्वागत आहे. दबाव टाकून कोणालाही पक्षात घेतले जात नाही.''
भाजप-शिवसेना महायुती होती तशीच पुढेही राहील. जागावाटपाचे अद्याप ठरलेले नाही. वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन जागावाटप होईल.
- सरोज पांडे, महाराष्ट्र प्रभारी, भाजप
|