नगर - "हवाओं का रुख बदल रहा हैं, अब हवा ही करेगी रोशनी का फैसला, जान होगी वही दिया रोशन होगा,' अशा शायरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेत जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये विरोधकांना लक्ष्य केले. "विरोधकांची अवस्था वर्गातल्या बुद्धू मुलासारखी झाली आहे; जो अभ्यास न करता परीक्षेला जातो आणि पेनला दोष देतो,' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. "पुढील 25 वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही. आता त्यांनी विरोधी पक्षात बसण्याचाच सराव करावा,' असा टोमणाही त्यांनी मारला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा जिल्ह्यातील अकोले येथून शुक्रवारी सुरू झाला. त्यात अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे सभा घेण्यात आल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, 'यात्रा काढणे, ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना "संघर्ष यात्रा' काढली. सत्तेत असल्याने आता "संवाद यात्रा' काढली. त्यात वावगे काय? कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'नेही अनेक यात्रा काढल्या. पण, आमच्या यात्रेला मैदानात जागा पुरत नाही. त्यांच्या यात्रेत मंगल कार्यालय भरत नाही. जनतेने नाकारलेय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते ईव्हीएमला दोष देतात. बटन मतदार दाबतो, हे ते विसरतात. आघाडी सरकारने 15 वर्षांत केली नसतील एवढी कामे गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केली.''
'महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. ते दहा-पंधरा वर्षांत सुधारले नाही, तर भविष्यात विरोधी पक्षनेताही निवडून आणता येणार नाही,'' असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.
या वेळी माजी मंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
विखे-शिंदे यांचे "डबल इंजिन'
गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'जिल्ह्याला आता विखे पाटील व शिंदे यांच्या रूपाने "डबल इंजिन' लाभले आहे. त्याला ओढण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे "हॉर्स पॉवर'चे मशिन आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.''
|