कणकवली : राज्यात सत्तेत असेलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी जोरदार टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी आज (रविवार) पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. हे तर स्थगिती सरकार, गेल्या दहा दिवसांत निव्वळ विकास कामांना स्थगिती देण्याचं काम या सरकारनं केले आहे. काम बंद करायची ठेकेदाराला बोलवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनं हे सगळं सुरू आहे. हे दीर्घकाळ चालणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. 15 ते 18 डिसेंबरला सिंधुदुर्गात आठ तालुक्यांत दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राणे म्हणाले, की राज्यातील विकास कामं ठप्प झाली आहेत. याला जबाबदार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्ष एकत्र आले ते जनतेसाठी, शेतकरी कामगार उद्योजक यांच्या हितासाठी एकत्र आले नाहीत तर, फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी एकत्र आले आहेत. त्यामुळं नक्कीच विकासावर परिणाम होणार आहे. सिंधुदुर्गात काल खासदारांनी आढावा बैठक घेतली. शिवसेना सत्तेत नाही. त्यामुळं सत्तेत नसताना खासदार अधिकाऱ्यांना आदेश कोणत्या अधिकारातून देत आहेत? बेकायदेशीरपणे केवळ आम्ही काही तरी करून दाखवण्यासाठी. पर्यटन क्षेत्राच्या निधीला स्थगिती दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.