
Ramesh Thorat: भाजपच्या अडचणी वाढल्या! आमदार राहुल कुल यांच्याविरोधात भाजप-राष्ट्रवादी एकत्र
खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणीही देखील केली आहे.
या प्रकरणामुळे भाजप आणि आमदार राहुल कुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल कुल यांच्याविरोधात दौंडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी राहुल कुल यांना पक्षातून निलंबन करवं अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे करणार आहेत.
नामदेव ताकवणे म्हणाले की, या घोटाळ्याचा निष्पक्ष पणे तपास करायचा असेल तर कुल यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठीं यांनी घ्यावा. तर राष्ट्रवादीचे जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले की, ६-७ महिन्यांपुर्वी कुल यांच्यावर १७९ कोटी रूपयांचे कर्ज थकले होते.
त्यावेळी त्यांनी बॅँकेला पत्र दिलं की आम्हाला ४५ दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर त्यांना ६० दिवसांची मुदत दिली. मात्र सहा महिने होऊन देखील त्यांनी कर्ज भरलं नाही. अशी माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले, "भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लाँडरिंग व्यवहार आहे.
निःपक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे. "संचालक मंडळाबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणतात, "आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे.. Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीस सरकारी पाठींबा आहे का? कारवाई करा!"