
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.
Budget Session : 'तीच काठी शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात'; अधिवेशनादरम्यान राजू शेट्टींचं सूचक ट्विट
Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 : राज्यविधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीनं कंबर कसलीये.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं होतं. या अधिवेशनातही विरोधकांनी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढण्याचे संकेत दिले आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जुनी पेन्शन योजना, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे, पाळत प्रकरण आणि हल्ल्यांचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांया समस्या, शेत मालाला मिळणारा कवडीमोल दर, कांदा उत्पादक आदी समस्यांवर विरोधी पक्ष आक्रमक पावित्रा घेतला आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्वीट करत विरोधी पक्षावर निशाणा साधलाय. राजू शेट्टींनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर 'सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतक-यांच्या पाठीत' अशा आशयाच ट्विट केलंय.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहून समाधान वाटलं. पण, हेच विरोधी पक्ष जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा भूमिअधिग्रहण, दोन टप्प्यातील एफ. आर. पी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारे निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगलं होतं. तेंव्हा आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभाग्रहात गोंधळ घातला व सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी मविआला केला आहे.
शेतकऱ्यांनो, राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात व सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आता विरोधी पक्षाची काय भूमिका असणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.