नमामि' नव्हे'क्षमामि' चंद्रभागा अभियान! 

Chandrabhaga river pollution is big issue in maharashtra
Chandrabhaga river pollution is big issue in maharashtra

सोलापूर ः 'नमामि चंद्रभागा' अभियानातील कामे कागदोपत्री निश्‍चित करण्यात आली असली तरी दृश्‍य स्वरूपात दिसत नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडून त्याची अंमलबजावणी होत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर फारशी प्रगती झाली नसल्याचे चित्र आहे. 

राज्यातील तमाम विठ्ठलभक्तांच्या जिव्हाळ्याचा भाग असलेल्या चंद्रभागा नदीचे जलप्रदूषण रोखण्याचा प्रयत्न अद्यापही यशस्वी झालेला नाही. नदीप्रदूषणाची मूळं पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. उजनी धरणातील जलप्रदूषण हा आणखी वेगळा व गंभीर मुद्दा आहे. नदी परिसर स्वच्छतेचा विषय पंढरपूर नगरपालिकेशी निगडीत आहे. अनेक चंद्रभागेच्या पात्रात गावातील अनेक गटारे थेट जोडल्याचे आढळून येते.

त्याबाबतही या योजनेतून काम अपेक्षित आहे. घाट परिसर व नदीच्या काठावर दुतर्फा वृक्षलागवडीचा मुद्दा वादात आहे. महसूल विभागाने नदीकाठी वृक्षारोपण करण्याची जागा निश्‍चित करणे, त्याला वनविभागाची साथ मिळणे आणि काठावरील शेतकऱ्यांचे सहकार्य मिळणे या परस्परविरोधी गोष्टी असल्याचे ध्यानात येत आहे. सौंदर्यीकरणाबाबत अशीच स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र विकास परिषद, वसुंधरा विकास संस्था आणि समग्र नदी परिवारातर्फे उद्या, रविवारी (1 जुलै) पंढरपुरात परिषद होणार आहे. 

भीमा खोरे विकासाचा विचार हवा 
नमामि चंद्रभागा अभियान किंवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पंढरपूर परिसर, घाट, चंद्रभागेचा काठ यांच्या विकासाचा विचार उपयोगाचा नाही. नदीजलप्रदूषण तर रोखायलाच हवे, मात्र एकूणच भीमा खोऱ्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवायला हवी. खोऱ्याच्या वरच्या टप्पातून समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या भागाकडे वळवायला हवे. दुष्काळ निवारणासाठी जलव्यवस्थापन करणे हाही या 'नमामि चंद्रभागा'चा अंगभूत भाग मानला पाहिजे. 

- शास्त्रोक्त जलविज्ञान आणि प्रदूषण नियंत्रणाचा विचार करून प्रकल्प उभारणी हवी. 

- नागरी सांडपाण्याच्या पुनर्वापराची यंत्रणा सक्षम करण्याची गरज.

- चंद्रभागा पात्रात कायम पाणी राखण्यासाठी सामन्यायाबरोबरच समन्वय हवा. 

- अधिकाऱ्यांच्या जलसाक्षरतेबाबत अधिकाधिक प्रयत्नांची गरज.

- केवळ चंद्रभागाच नव्हे तर भीमा खोऱ्याचा एकात्मिक विकास व्हावा.

'नमामि चंद्रभागा' अभियानांतर्गत भुयारी गटार 3 रा टप्पा, मलनिःस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा डेपो, वृक्षलागवडीची कामे सुरू झाली आहेत. सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीआधीच ती कार्यान्वित करण्यात आली असून ती यथाशीघ्र पूर्ण होत आहेत. 

अभिजित बापट, मुख्याधिकारी, पंढरपूर 

चंद्रभागेच्या काठावर वृक्ष लागवडीचा भाग आमच्या विभागाकडे नाही. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रविवारपासून जिल्ह्याच्या विविध भागात वृक्षलागवड केली जाणार आहे. माळकवठे येथे त्याचे रविवारी उद्धाटन होणार आहे. 

सुवर्णा झोळ, प्रमुख, सामाजिक वनीकरण, सोलापूर 


जनतेच्या भावनेला हात घालून 'नमामि चंद्रभागा'ची घोषणा केली. प्रत्यक्षात काहीच काम केले नाही. त्यामुळे आम्ही 'क्षमामि चंद्रभागा' परिषदेचे आज पंढरपुरात आयोजन केले आहे. चंद्रभागेतील प्रदूषण हटवून तिला पुनर्वैभव देण्यासाठी आम्ही झटत आहोत. 
अनिल पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र विकास परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com