मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची भावना जपावी: चव्हाण

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - ‘मराठा समाजाचे मोर्चे हे मला हटवण्यासाठी असू शकतात. मी मुख्यमंत्रिपदावरून गेल्याने मराठा समाजाचे सर्व प्रश्‍न सुटणार नाहीत,‘ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्‍तव्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज खिल्ली उडवली.  ‘मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून, मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची खुर्ची जपण्यापेक्षा मराठा समाजाच्या भावना जपाव्यात. अकारण या लाखो मराठा बांधवांच्या मोर्चांना राजकीय वळण देऊ नये,‘‘ अशा शब्दांत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
 

गांधी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या मोर्चाबाबत बोलताना ते म्हणाले, की न भूतो.. असे हे मोर्चे आहेत. मी स्वत: नांदेडच्या मोर्चात सहभागी होतो. पण माझ्या राजकीय आयुष्यात असा भव्य व शांतता मार्गाचा मोर्चा नांदेडमध्ये पाहिला नाही. या मोर्चेकऱ्यांची भावना उत्स्फूर्त आहे. त्यांच्यामागे कोणतीही राजकीय शक्‍ती नाही. अकारण कोणी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही करू नये. कारण, एवठ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला असताना त्यामागची भावना जाणून घ्यावी. या समाजाचे प्रश्‍न कसे मार्गी लागतील, त्याचा सरकारने प्रयत्न करावा. मात्र, या सरकारच्या कार्यपद्धतीवरच मराठा समाजाचा विश्‍वास नसल्याने एवढे मोठे मोर्चे निघत असल्याचे नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

ऍट्रॉसिटी कायद्याचा काही प्रमाणात निश्‍चित गैरवापर होतो. तो होऊ नये एवढीच मराठा समाजाची भावना आहे. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, असे कुठेही कोणीही म्हणत नाही. या कायद्याचा गैरवापर होणार नाही, त्यासाठी आवश्‍यक बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com