मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाणे येथे आज (गुरुवार) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. शाळा, कॉलेजमधील विध्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक व सकस आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेशस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी विविध शाळा व कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक, कॅन्टीनचालक तसेच पालक उपस्थित होते.
स्वस्थ भारत घडवण्यासाठी "जंक फूड हटवूया, स्वस्थ भारत घडवूया" असा संदेश मंत्री रावल यांनी उपस्थितांना दिला. त्याचबरोबर पोषक आहार, खाद्यपदार्थांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने सुनिश्चित केलेली मार्गदर्शक तत्वे प्रशासनामार्फत राज्यातील 16 हजार 925 शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्यात आली असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली.
संतुलित आहार आणि त्याचे आरोग्यावर परिणाम याची कार्यशाळा वर्षातून एकदा आयोजित करणे. शाळा-महाविद्यालय जवळच्या 50 मीटर परिसरात चिप्स, तळलेले अन्न, बटाटा फ्राईड, गोडपदार्थ विक्रीस प्रतिबंध करणे, कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचे पालन आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच स्वस्थ व मजबूत भारत निर्माण करण्यासाठी शहराबरोबरच गावात राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत पौष्टिक, सकस आहार व अन्न सुरक्षाबाबत काळजी घेतली जाईल, असेही मंत्री रावल म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.