काँग्रेस राजवटीपेक्षा जास्त बिघडली परिस्थिती-सेना

काँग्रेस राजवटीपेक्षा जास्त बिघडली परिस्थिती-सेना

मुंबई - काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे व स्थिती काँग्रेस राजवटीपेक्षा जास्त बिघडली आहे हे सत्य स्वीकारायला हवे. जम्मू-कश्मीरच्या लष्करी मुख्यालयावर फक्त चार अतिरेकी हल्ला करतात व आमचे 17 जवान मारले जातात. पाकिस्तानने केवळ चार अतिरेक्यांचा मोबदला देऊन हिंदुस्थानच्या 17 जवानांचा बळी घेतला. त्यामुळे युद्धात जिंकले कोण?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

उत्तर काश्‍मीरमधील उरी शहरात आज (रविवारी) सकाळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी एका बटालियन मुख्यालयावर हल्ला केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले आणि अन्य 19 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेनेही सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून पाकिस्तानवर रोष व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींकडेही प्रश्न उपस्थित केले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, हिंदुस्थानचे जगद्विख्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तबगारीचा डंका विश्‍वात पिटला जात आहे. रविवारी दिवसभर मोदी यांच्यावर त्यांच्या वाढदिवसासाठी जागतिक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच कश्मीरातील आमच्या लष्करी तळांवर पाकड्या अतिरेक्यांनी भयंकर दहशतवादी हल्ला करून देशाला हादरा दिला आहे. गुजरातमध्ये वाढदिवसाचा भव्य आणि ऐतिहासिक केक कापला जात असताना पाकड्या अतिरेक्यांनी जम्मू-कश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात आमचे १७ जवान शहीद झाले. पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्यापेक्षा हा मोठा हल्ला असून हिंदुस्थानच्या संरक्षण सज्जतेची ही बेअब्रू आहे. मोदी यांच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला तडा देण्याचे हे कारस्थान आहे.

कश्मीरात मरणार्‍या जवानांना फक्त शहीदाचा दर्जा देऊन आणि त्यांच्या शवपेट्यांवर पुष्पचक्रे अर्पण करून हे संपणार नाही. राजनाथ सिंह अमेरिकेत जाण्यासाठी विमानाच्या पायर्‍या चढतच होते, पण उरी येथे दहशतवादी हल्ला झाल्याने त्यांनी परदेश दौराच रद्द केला. रशिया, अमेरिका हे देश कश्मीर वाचवणार नाहीत. जागतिक नेत्यांनी उधळलेल्या शब्दसुमनांपेक्षा आमच्या लष्कराला बळ देणे गरजेचे आहे. कश्मीरमध्ये पुन: पुन्हा दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यांना अद्याप आळा बसलेला नाही. हे अपयश कोणाचे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि या हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांना सोडणार नाही असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांचा हा इशारा योग्यच आहे, पण त्याचा परिणाम पाकिस्तानसारख्या देशावर किती आणि कधी होणार हा प्रश्‍न कायमच आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com