वर्धा - कॉंग्रेसचे शक्तिस्थळ असलेल्या महात्मा गांधीच्या कर्मभूमी सेवाग्राममधून आज कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी क्रांतीची वाट धरत असल्याचे जाहीर केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी आश्रमात कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याचे धाडस करत राहुल गांधी यांनी आगामी लोकसभेचे रणशिंगच आजच्या भरगच्च कार्यक्रमातून फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक प्रतिमेला व लोकप्रियतेला "गांधी की राह पर' अशा घोषवाक्यातून आव्हान देतानाच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर जोरदार हल्ला राहुल यांनी चढवला. आजपर्यंत माध्यमे व लोकसभेतून नरेंद्र मोदींवर आरोप करणाऱ्या राहुल यांनी आज पहिल्यांदाच जनसभेत थेट हल्लाबोल करत आगामी काळातली आक्रमकता स्पष्ट केली.
आजच्या सभेला देशभरातील दिग्गज कॉंग्रेस नेते उपस्थित होते. दिवसभर गांधी आश्रमात पूर्णत: कॉंग्रेसमय वातावरण होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग तसेच सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल यांचा वावर आत्मविश्वासाने असल्याचे चित्र होते. विदर्भातून प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्त्यांची गर्दी जमा केली होती.
सभेत राहुल गांधी यांनी जनसंवाद साधतच भाषण केले. महात्मा गांधीजींच्या सत्यव्रताचा दाखला देत मोदी यांनी 2014 ला दिलेली आश्वासने पाळली काय, असा प्रश्न राहुल यांनी केला तेव्हा सभेतून उत्स्फूर्तपणे "नाही नाही'च्या घोषणा दणाणल्या. या सभेतून राहुल गांधी यांनी युवक, शेतकरी, शेतीमालाचे भाव, रोजगार, महागाई या मुद्द्यांवर भर देत उपस्थितांची दाद मिळवली. त्याहून अधिक "राफेल' व्यवहार, कर्जबुडवे व्यापारी यांच्यावरून थेट पंतप्रधानांचे नाव घेऊन हल्ला चढवल्यानंतर उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणांनी मैदान दणाणून सोडले.
|