कापूस उत्पादकांवर अवकाळी संकट

लेवा, यवतमाळ - कापसाची बोंडे पावसामुळे सडली आहेत.
लेवा, यवतमाळ - कापसाची बोंडे पावसामुळे सडली आहेत.

राज्यात ११ हजार कोटींचे नुकसान; ४५ टक्के क्षेत्रावर घाला
नागपूर - राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपात सर्वांत मोठे पीक असलेल्या कापसाचे सुमारे ४५ टक्‍के क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय प्रतिकूल हवामानामुळे निविष्ठा खर्च दुप्पट ते तिप्पट झाला आहे. घटलेली उत्पादकता, वाढलेला उत्पादन खर्च आणि पिकांच्या झालेेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सुमारे ११ हजार कोटींच्या वर थेट फटका बसला आहे. 

गेल्या वर्षीच्या कापूस दरातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड क्षेत्र वाढविले होते. गेल्या वर्षी कापसाला शेवटच्या टप्प्यात सहा हजार रुपये प्रति क्‍विंटलपर्यंतचा दर मिळाला. या वेळी देखील कापूस खऱ्या अर्थाने नगदी पीक ठरेल, असा विश्‍वास होता. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या ३९ लाख हेक्‍टरवर क्षेत्रावरून या वर्षी राज्यात ४४ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली.
परंतु मॉन्सूनोत्तर पावसाने पुरती दाणादाण उडाली. पावसाचा मारा झाल्याने बोंडे सडली; काही ठिकाणी नख्यात असलेला कापूस ओला झाल्याने त्याची प्रत खालावली तर काही ठिकाणी कापूसदेखील काळवंडल्याने त्याला खरेदीदारदेखील उरला नाही. स्टेंपल लेंथ (तंतूची लांबी) हा घटक कापसाच्या विक्रीत महत्त्वाचा असतो; परंतु पावसामुळे अपेक्षित स्टेंपल लेंथ मिळणार नाही.

दृष्टिक्षेपात राज्यातील कापूस नुकसान
- एकूण लागवड : ४४ लाख हेक्‍टर
- सरासरी उत्पादकता : ४ क्‍विंटल
- एकूण उत्पन्न प्रति एकर (बाजारभावाप्रमाणे) : १९२०० रुपये
- या वर्षी उत्पादन खर्च प्रति एकर : २५ हजार रुपये.
- बाधित पीक टक्के : ४५ टक्के
- सध्याचा बाजारभाव : ४८०० रुपये प्रति क्विंटल
- हमीभाव दर : ५५५० रुपये प्रति क्विंटल

पावसामुळे पिकाचा उत्पादकता कालावधी वाढला असला, तरी उत्पादकतेवर त्या प्रमाणात परिणाम होणार नाही. कापसाचा दर्जा मात्र काही अंशी खालावणार आहे. त्यामुळे दराच्या बाबतीत निश्‍चित सांगता येणार नाही. परिणामी, उत्पादकता आणि उत्पन्न या दोन वेगवेगळ्या बाबी या वेळी विचारात घ्याव्या लागतील.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

कापसाचा हंगाम लांबल्याने गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची भीती अधिक आहे. सोबतच कापसाची प्रतही खालावल्याने दर अपेक्षित मिळण्याची शक्‍यता कमीच आहे.
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर

दोन एकरांवरील कापूस तीन हजार रुपये क्‍विंटलने व्यापाऱ्यांनी मागितला. जिल्हा बॅंकेचे दोन लाख रुपयांचे थकीत कर्ज आहे. गेल्या हंगामात एकरी दहा क्‍विंटल कापूस झाला. आता दिवाळीपर्यंत कापसाच एक बोंडही घरात आले नाही, झाडावरील १०० बोंडांपैकी दोन बोंडांतच कापूस आहे. पंचनामे सुुरू असले तरी भरपाईचं काही खरं नाही.
- साहेबराव खंदारे, लेवा, ता. महागाव, जि. यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com