'शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज'

'शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज'

मुंबई - शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित या कार्यकमाचा दुसरा भाग सह्याद्री वाहिनीवरून आज प्रसारित झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात अनुदाने थेट जमा करण्याबाबत सरकारचा निर्णय जाहीर केला होता आणि कर्जमाफीच्या विषयावर सरकारची भूमिका मांडली होती. 

सौर ऊर्जा व पडीक शेतजमिनीसंदर्भात उमाकांत जोशी व स्वामी विशे यांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मुख्यमंत्री म्हणाले, की सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी देत असून, राज्यात सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे. यशवंत पोपळे व मधुकर पवार या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत होते, उत्पादकता वाढते, सूक्ष्म सिंचनामुळे पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करता येते. सरकार साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या मदतीने राज्यातील पाच धरणक्षेत्रांतील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार असून, तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पाच नद्यांचे पुनरुज्जीवन करून कोकणातील फळप्रक्रिया उद्योगाला चालना देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

एसएमएसद्वारे नाशिकच्या सदाशिव पांगरे यांनी हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होत असलेल्या परिणामाचा कसा मुकाबला करणार या बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश वातावरणातील बदलाचा मुकाबला करणारी शेती तयार करणे असा आहे. नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागणाऱ्या आच्छादनाची निर्मितीही राज्यात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे आच्छादनाच्या किमतीही कमी होतील. 

हळद प्रक्रियेसाठी 50 लाखांची योजना 
सातारा येथील राजेंद्र गायकवाड यांनी हळद पीक संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की जगात हळदीचे महत्त्व वाढत असून, यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. हळदप्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतची योजना आहे. सातारासह राज्यातील अन्य जिल्ह्यांतील हळद उत्पादक शेतकऱ्यांना ही योजना फलदायी ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com