धनगर समाजाचा विश्‍वासघात

धनगर समाजाचा विश्‍वासघात

मनमाड, (जि. नाशिक) - भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करून आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज एल्गार मेळाव्यात केले. धनगर समाजाने भाजपला सत्तेवर आणले. मात्र भाजपने आमचा विश्‍वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला.  

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता आरक्षणाच्या मुद्यावर धनगर समाज देखील पेटून उठला असून, आज मनमाड शहरात नाशिक जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्याचे आले होते. या वेळी पडळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

या वेळी पडळकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या निवडणुकीच्या वेळी धनगर समाजांनी भाजपला एकगठ्ठा मतदान करून केंद्र व राज्यात सत्तेवर आणले. मात्र सत्तेवर येताच आमचा विश्वास घात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असताना त्याच्याकडे सतत दुर्लक्ष करण्यात आल्याने तो सर्व सुविधांपासून वंचित आहे. मात्र आता धनगर समाज जागृत झाला असून, आपले हक्क मिळविण्यासाठी एकवटला आहे, असा दावा त्यांनी केला.

या वेळी उत्तम जानकर यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. शासनाने धनगर व धनगड असा शब्दांचा घोळ घालून धनगरांना अरक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे. मात्र त्यांचा हा डाव धनगर समाज आगामी निवडणुकांमध्ये हणून पडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आता आरक्षणासोबत सत्तेत वाटाही हवा असल्याचे जानकर यांनी सांगितले.

विशेष अधिवेशन बोलवा - विखे पाटील
धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यासाठी राज्य सरकारने विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. ते म्हणाले की, धनगर आरक्षणासंदर्भात टीआयएसएसचा अहवाल सरकारला सादर होऊन दीड महिना झाला आहे. मात्र अद्यापही शासनाचा अभ्यास झालेला दिसत नाही. आता सरकार सांगते की, आम्ही फेब्रुवारीमध्ये  याबाबत निर्णय घेऊ. पण शासनाला काहीही निर्णय घ्यायचा नसून, केवळ केंद्र सरकारला शिफारस पाठवायची आहे.

‘क्‍या हुवा तेरा वादा’ - धनंजय मुंडे
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळावा. धनगर समाज सध्या सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे अस्वस्थ आहे. यावर लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे आहे, अशी आग्रही भूमिका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली. खांद्यावर घोंगडी घेऊन आलेले रामराव वडकुते यांनी उपस्थित केलेल्या धनगर आरक्षण प्रश्नाला दुजोरा देत मुंडेंनी आपले मत मांडले. यंदा आषाढी पूजेला धनगर समाजाने विरोध करावा, अशी सरकारची अपेक्षा आहे का? असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com