सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने सवलती जाहीर केल्या. परंतु, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारच्या आदेशानुसार ऑक्टोबर-2018 पूर्वीच्याच परीक्षांचे शुल्क माफ करण्यात आले आहे. आता मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के फी घेतली जाणार असल्याचे स्पष्टीकरण सोलापूर विद्यापीठाकडून देण्यात आल्यामुळे परीक्षा शुल्क जमविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.
शिष्यवृत्ती मिळत असणाऱ्या आणि खुल्या प्रवर्गातील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला होता. मात्र, तो औटघटकेचा ठरला आहे. पाण्याअभावी शेती ओस पडली तर उपलब्ध पाण्यात पिकविलेल्या पिकाला दर मिळेना, अशी अवस्था आहे.
ऑक्टोबर महिन्यापूर्वी झालेल्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याबाबत शासनाचे परिपत्रक विद्यापीठाला मिळाले आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून पात्र विद्यार्थ्यांना शुल्क माफ करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु, मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या परीक्षांची फी माफी संदर्भात काहीच निर्देश नसल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाईल.
- श्रीकांत कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ
|