112 तालुक्यांत गंभीर, तर 39 तालुक्यांत मध्यम दुष्काळ
सोलापूर - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सॅटेलाइटद्वारे केलेल्या पाहणीत प्रारंभी 201 तालुक्यांत "ट्रिगर-1' लागू करण्यात आला. त्यानंतरच्या पाहणीनुसार 180 तालुक्यांत "ट्रिगर टू' लागू झाला होता. मात्र, अंतिम पडताळणीनंतर राज्यातील 112 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 39 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाची घोषणा करणार आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीनुसार केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. दुसरीकडे दुष्काळाची तीव्रता कमी अथवा मध्यम असल्यास केंद्राकडून 75 टक्के, तर राज्याकडून 25 टक्के मदत मिळते. मात्र, केंद्राच्या महामदत ऍपच्या साह्याने सॅटेलाइटद्वारे केलेल्या दुष्काळाच्या पाहणी अहवालानुसार केंद्र सरकारकडून राज्याला ठोस मदत मिळण्याची आशा धूसर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मदतीसाठी मारक मुद्दे...
- जून-जुलैतील पावसामुळे राज्यात खरिपाची अधिक पेरणी
- जुलै-सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत पाणीपातळी अधिक
- नव्या निकषांनुसार जमिनीची आर्द्रता जिल्ह्यातून एकच घेतली जाते
- पीक कापणी व पिकांची वाढ याचा शासनाकडे सकारात्मक अहवाल प्राप्त
राज्यात 489 टॅंकर
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, सद्यःस्थितीत राज्यातील 437 गावे व 755 वाड्यांवर 489 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत केवळ 74 टॅंकर सुरू होते. वैरण विकास योजनेंतर्गत अद्यापही चारा लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे जनावरांची उपासमार होतानाचे चित्र आहे.
राज्यातील दुष्काळाच्या अहवालाबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. केंद्र सरकारच्या निकषांनुसार दुष्काळाची घोषणा केली जाईल. परंतु, दुष्काळाने बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून ठोस मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
|