राज्यात दुष्काळ जाहीर करावा - सुप्रिया सुळे

Supriya-Sule
Supriya-Sule

अमळनेर - केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून, यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा झाली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आज महिला मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, नागपूरचे आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजीव देशमुख, अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, की गेल्या तीन दिवसांपासून मी जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळाची तीव्र दाहकता दिसून येते. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. आजूबाजूच्या राज्यांत दुष्काळ जाहीर झाला; मात्र आपले शासन हे दुष्काळावर अभ्यास करण्यासाठी वेळ घालवत असल्याने शेतकरी हिताचा निर्णय घेता येत नाही.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करतात. दुष्काळाची पाहणी ही नागरिकांमध्ये फिरून करावी लागते, आकाशातून नाही. त्याशिवाय दुष्काळाची दाहकता दिसून येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू करण्यात आलेली शेतकरी सन्मान योजना ही पूर्णत: फसवी असून, या योजनेत शासन पूर्णत: अपयशी ठरले आहे.

राज्यात विकासकामांच्या जाहिराती दिसतात. दिवसाला लाखो रुपये खर्च केले जातात; मात्र, विकासकामे दिसत नाहीत. राज्यात कोळशाचे नियोजन चुकल्याने भारनियमनाची मोठी समस्या उभी राहिली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. महागाई रोजच वाढत आहे, याला शासनच जबाबदार आहे. या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून, यावर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com