बदलीनंतरही जिल्हा परिषद शिक्षकांना जूनमध्येच नवीन शाळा! मेनंतर बदलीचा दुसरा टप्पा

सात महिन्यानंतरही ऑनलाईन बदली प्रक्रिया संपलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याअंतर्गत बदल्या झाल्या, तरी शिक्षकांना जूनमध्येच नवीन शाळांवर रुजू व्हावे लागणार आहे. मेनंतर बदलीचा दुसरा टप्पा आहे.
 teachers
teachers sakal

सोलापूर : आंतरजिल्हा बदलीनंतर आता जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ऑगस्टपासून सुरु झालेली ऑनलाईन बदली प्रक्रिया सात महिन्यानंतरही संपलेली नाही. त्यामुळे आता जिल्ह्याअंतर्गत बदल्या झाल्या, तरीदेखील त्या शिक्षकांना जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावरच नवीन शाळांवर रुजू व्हावे लागणार आहे. मेनंतर बदलीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्यांमधील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी यंदा प्रथमच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासंबंधीचे आदेश दिले होते. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याने अनेकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारीवरून तो निर्णय झाला. पण, मे २०२२ मध्ये सुरु होणारी बदली प्रक्रिया जुलै-ऑगस्टमध्ये सुरु झाली. सुरवातीला आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही पार पडली. आता जिल्ह्याअंतर्गत संवर्ग एक ते चारच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. २३ फेब्रुवारीनंतर संबंधित शिक्षकांच्या बदलीची कार्यवाही पूर्ण होणार आहे. परंतु, १५ जून ते फेब्रुवारी असा एकाच शाळेत आठ महिने अध्यापन केलेल्या शिक्षकांना मधूनच बदली करणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने परडणारे ठरणार नाही. त्यामुळे त्या शिक्षकांची बदली झाली, तरीही १५ जून रोजी शाळा सुरु झाल्यावर नवीन शाळेवरच ते शिक्षक रूजू होतील, असे नियोजन ग्रामविकास विभागाने केले आहे.

‘आंतरजिल्हा’चे ६० टक्के शिक्षक जागेवरच

आंतरजिल्हा बदलीत दहा टक्क्यांपेक्षा कमी रिक्तपदे असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना त्याचा प्राधान्याने लाभ दिला जातो. पण, यंदा दहा टक्क्यांपेक्षा जास्त रिक्तपदे असलेल्या शिक्षकांनाही संधी दिली. त्यामुळे काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील बाहेरील जिल्ह्यातील शिक्षकांना बदलीनंतर कार्यमुक्त केले. पण, त्या रिक्त झालेल्या जागांवर ६० टक्के शिक्षक अजूनही आलेले नाहीत. रिक्तपदे १० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने बहुतेक जिल्हा परिषदांनी तेथील शिक्षकांना बदली होऊनही कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे आता शिक्षक भरतीनंतरच ते शिक्षक स्वत:च्या जिल्ह्यातील जातील, अशी स्थिती आहे.

बदलीनंतर सर्व शाळांना मिळतील पुरेसे शिक्षक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ शाळांमध्ये साडेपाचशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ५३ शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आहेत. आंतरजिल्हा बदलीनंतर जवळपास ९० शिक्षक अजूनही आलेले नाहीत. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच शाळांना समान शिक्षक मिळतील अशी आशा आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com