मुंबई - राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असताना भाजप-शिवसेनेचे सरकार दुष्काळी उपाययोजना सुरू असल्याचे ढोल बडवते आहे. हे वस्तुस्थितीचे "भान' नसलेले "बेभान' सरकार आहे.
सरकारने तातडीने प्रभावी व व्यापक उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी सुखी झाला तर मीच या सरकारचा डीजे लावून सत्कार करीन, अशी उपहासात्मक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विधानसभेमध्ये नियम 293 अंतर्गत दुष्काळी उपाययोजनांसंदर्भातील चर्चेमध्ये ते बोलत होते. विखे पाटील यांनी या वेळी केंद्र व राज्य सरकारच्या कृषिविषयक धोरणांवर कडाडून टीका केली. सरकारने जाहीर केलेला दुष्काळ पुरेसा नाही. केंद्र सरकारच्या कठोर निकषांमुळे अनेक दुष्काळी तालुके या यादीतून वगळले गेले. सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र, दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणतीही थेट भरीव मदत जाहीर केली नाही, असे सांगून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत, फळबागा, डाळिंब, द्राक्ष, उसाला 1 लाख रुपये हेक्टरी मदत, खरीप 2018 पर्यंतचे सर्व शेतीकर्ज माफ करणे आदी मागण्या त्यांनी या वेळी केल्या.
|