शेतकरी कर्जमाफीपासून वंचित - सचिन सावंत

Sachin-Sawant
Sachin-Sawant

मुंबई - राज्य सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वांत मोठी कर्जमाफीची जाहीर केलेली योजना अपयशी ठरली असून, अजूनही ५० टक्‍के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकऱ्यांचा प्रचंड पुळका आल्याचे दाखवून कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली, त्याला आता २७ महिने झाले आहेत. ही योजना देशातील सर्वांत मोठी कर्जमाफीची योजना असेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते; परंतु कमीत कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल हाच या सरकारचा कटाक्ष राहिला आहे. या योजनेची अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर सातत्याने या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून लाखो शेतकरी वगळले गेले आहेत, अशी माहिती सावंत यांनी आकडेवारी सादर करत दिली. एकूण ४४ लाख ४ हजार १४७ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत १८ हजार ७६१ कोटी ५५ लाख रुपये जमा करण्यात आले. 

याचाच अर्थ जवळपास ४५ लाख शेतकऱ्यांना अजूनही लाभापासून वंतिच ठेवले असून, कर्जमाफीच्या रकमेचा आकडाही ५० टक्‍क्‍यांच्या आसपासच आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर एकवेळ समझोता योजना ही धूळफेक असल्याचा काँग्रेसचा आरोपही सत्य ठरल्याचे सावंत म्हणाले. या योजनेत केवळ ४ लाख २६ हजार ५८८ शेतकऱ्यांना २ हजार ६२९ कोटी रूपये देण्यात आले आहेत. जवळपास ६ लाख पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभच मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com