मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके पुराच्या चक्रात अडकले आहेत. पुराचा जबरदस्त फटका बसलेल्या गावांची संख्या राज्यात ७८१ इतकी आहे.
राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार, तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे. या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४, तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.