दुष्काळ झळा

दुष्काळ झळा

मुंबई -चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता दुष्काळाची वाढती तीव्रता सर्वांच्याच चिंतेचा विषय बनली आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या नागरिकांना अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलत दुष्काळी उपाययोजनांना वेग देण्याची मागणी राज्यातील जनतेकडून होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरवात केली आहे. एकूणच, निवडणुकीच्या रणधुमाळीत काहीसा मागे पडलेला दुष्काळाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे चारा छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

यंदाच्या दुष्काळाची तीव्रता खूपच भयावह असल्याचे जाणवत आहे. त्यात भर म्हणून गेले काही दिवस उष्णतेची लाट उसळली आहे. परिणामी, राज्यातील जलस्रोत मोठ्या प्रमाणावर कोरडे होत चालले आहेत. उन्हाळ्याचा दाह वाढू लागल्यापासून अनेक गावांतील जलस्रोत संपू लागले आहेत. त्यामुळे गाव-वाड्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. भूजलपातळी खाली गेल्याने तसेच जलस्रोत कोरडे पडू लागल्याने विहिरी आणि बोअरवेलमधूनही पाणी मिळणे कठीण होत असल्याने टॅंकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com