मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही आम्ही शिवसेनेला वैचारिक आधारावर हृदयात स्थान दिले; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुद्गार काढणे मैत्रीच्या कोणत्या कोष्टकात बसते, असा सवाल ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
मुंबईकरांच्या भल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शिवसेना कधीच कामाला लागली नाही. त्यामुळे आता परिवर्तनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी आज केले. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे प्रादेशिक पक्षांचा महासंघ बांधू पाहतात. ते आता अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्याशी वैचारिक मैत्री जमवणार आहेत की काय? विधानसभा निवडणुकीतील टीका-टिप्पणीनंतर हिंदुत्वाच्या एकीकरणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सामावून घेतले. त्यांच्याच प्रयत्नांना खोटे ठरवत सेनेने जी टीका सुरू केली आहे, ती दुर्दैवी आहे.
मुंबई महानगराच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची चर्चा आपण स्वतः महापौर बंगल्यात सेनेच्या नेत्यांशी वारंवार करायचो; परंतु त्यातील कोणत्याही प्रकल्पाला सेनेने कधीच प्रतिसाद दिला नाही. ही अनास्था नेमकी कशामुळे? असा प्रश्न करत आता टक्केवारी नाकारणाऱ्या पारदर्शकतेलाच मुंबईकरांनी मत द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः नागपूरचा जो विकास केला आहे, तो मुंबईसारख्या आर्थिक संपन्न महापालिकेत सुरू झाला, तर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशात मानाचे स्थान मिळवेल, असेही ते म्हणाले.
|