हुतात्मा दर्जासाठी जवानाच्या कुटुंबावर आली उपोषणाची वेळ

हुतात्मा दर्जासाठी जवानाच्या कुटुंबावर आली उपोषणाची वेळ

येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. आमदार बच्चू कडू हे देखील या उपोषणात सहभागी होणार आहेत.

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपोषणस्थळी दाखल होत आहेत. शासनाकडून या कुटुंबावर अन्याय सुरु असून, एका जवानाने आपला प्राण गमावला तरी केंद्रीय राखीव दल दखल घेत नसल्याने उपोषणाची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हुतात्मा शेळके हे तेजपूर (आसाम) केंद्रीय राखीव दलाच्या बटालियन अल्फा कंपनीमध्ये कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असून, सबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करावा व जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा घोषित करावे, यासाठी हे उपोषण सुरु आहे.

मुळात जेव्हा घटना घडली. तेव्हापासून ही मागणी केली जात आहे. कुटुंब व गावाने शेळके यांचे पार्थिव देखील ताब्यात घेण्यास नकार दिला होता. तसेच मानोरी येथील ग्रामस्थांनी व परिसरातील गावांनी रास्ता रोको आंदोलने देखील केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्व शांत होऊन अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
परंतु घटनेनंतर पाच महिने होऊनही अद्याप शेळके कुटुंबास न्याय मिळालेला नाही.

काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यापलीकडे काहीही घडले नसून, हुतात्मा जवानाच्या अस्थी विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या महिन्यात येवला दौऱ्यावर असलेले आमदार बच्चू कडू यांनी हुतात्मा जवान शेळके कुटुंबाची भेट घेऊन याप्रश्नीे सरकार दरबारी आवाज उठविण्याचे आश्वासन दिले होते.

राजकीय नेते, आमदार, खासदार, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व मंत्री यांनी शेळके कुटुंबाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र, आमदार कडू यांनी जवान शेळके यांना न्याय मिळवून देण्याच्या आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेतली असून, या कुटुंबाला पाठिंबा देत उपोषणाला आजपासून सुरवात केली. 

प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके,जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, शरद शिंदे, प्रहार शेतकरी संघटनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, येवला तालुका प्रमुख हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, तालुका उपाध्यक्ष वसंतराव ठाण मांडून आहेत. आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमदार नरेंद्र दराडे यांनी शेळके कुटूंबाची भेट घेतली. निवृत्त मेजर रामदास खटकाळे, विजय मोरे, सचिन खटकाळे , सावळी राम खटकाळे,आदींसह मानोरी येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.

सैन्य दलात काम केलेल्या जवानांच्या विधवा पत्नीला उपोषण करावे लागत आहे. याहून मोठे दुर्दैव नसून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याचे प्रहराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com