मुंबई - महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही वाट बघतोय की अजून कर्जमाफीमध्ये काही तरी मिळेल; परंतु सरकारने ठिबक सिंचन योजनेसारखी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याची टीका विधानसभेतील गटनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना केली.
दुष्काळाच्या प्रश्नावर आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या विरोधात जोरदार फटकेबाजी केली. अधूनमधून मंत्र्यांना चिमटे काढत तर कधी शालजोडीतील फटकारे देत विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात 1972 नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ आहे. सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये पाण्याची तीव्रता जाणवली नव्हती. त्यामुळे न भूतो न भविष्यती असा दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील जनतेचे स्थलांतर रोखता येणार नाहीय. दुष्काळ जाहीर करणे आणि त्यासाठी लागणारी साधने उभी करणे आवश्यक होती; परंतु या दुष्काळाची तीव्रता या सरकारला आहे का. या सरकारचे पाय जमिनीवर आहेत का? हे सरकार दुष्काळाची तीव्रता सॅटेलाइटने पाहत आहे, यावरून यांची मानसिकता लक्षात येते, असेही जयंत पाटील म्हणाले. लाखो विहिरी बांधल्या...करोडो झाडे लावली...जलयुक्त शिवारावर करोडो रुपये खर्च केले...मागेल त्याला शेततळे दिले...चार वर्षांत एवढी चांगली कामे केली तर हा दुष्काळ का पडतोय, याचेही आत्मचिंतन सरकारने करायला हवे, असा जबरदस्त टोला जयंत पाटील यांनी लगावला.
|