सरकारने आम्हाला चांगली वागणूक दिली नाही; उपोषणकर्त्या मुलींची खंत

सरकारने आम्हाला चांगली वागणूक दिली नाही; उपोषणकर्त्या मुलींची खंत

​नगर : "सरकारने आम्हाला आजीबात चांगली वागणूक दिली नाही. मात्र आमची लढाई संपलेली नाही. येथून (जिल्हा रुग्णालयातून) बाहेर पडण्यासाठी उपोषण सोडत आहोत'', अशी हतबलता व्यक्त करत.'' पुणतांबा (जि. नगर) येथील तीनही शेतकऱ्यांच्या मुलींनी आज जिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन उपोषण सोडले. गावकऱ्यांसह अनेकांनी मात्र हे अंदोलन पडपल्याचा आरोप केला आहे. दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मागण्यावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्यावर्षी देशभर गाजलेल्या शेतकरी संपाची सुरवात पुणतांबा येथून झाली होती. त्यानंतर सरकारने भरभरुन अश्‍वासने दिली होती, मात्र त्या अश्‍वासनाची पुर्तता झाली नाही. त्यामुळे गेल्या 4 फेब्रुवारीपासून पुणतांबा येथे निकिता धनंजय जाधव, पुनम राजेंद्र जाधव, शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग अंदोलन सुरु केले. पहिले चार दिवस प्रशासनाने अंदोलनाची आजीबात दखल घेतली नाही. चौथ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी उपोषणकर्त्या तरुणींची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र त्यांचेही
प्रयत्न असफल झाले. चौथ्या दिवशी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली, मात्र अन्य उपोषण कर्त्या तरुणींसह गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले नव्हते, मात्र शुक्रवारी गावकऱ्यांचा विरोध मोडून शुभांगीला उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत भेट देऊन माहिती घेणार असल्याची चर्चा होती, मात्र ते आले नाही. मात्र आज शनिवारी पहाटे पोलिसांनी निकिता धनंजय जाधव, पुनम राजेंद्र जाधव यांना बळजबरीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

सकाळी पावणे बारा वाजता राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. मात्र रात्री तीन वाजपासून उपोषण करणाऱ्या मुली नजरकैदेत असल्यासारख्या होत्या. प्रचंड पोलिस बंदोबस्तात मुलींसोबत अतीदक्षता विभागात तासभर चर्चा केल्यानंतर मुलींना बाहेर आणले. "आमची प्रकृती खराब आहे. पोटात अन्न गेल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. आमची लढाई संपलेली नाही. त्यामुळे येथून बाहेर पडण्यासाठी उपोषण सोडावे लागत आहे अशी हतबलता व्यक्त करत उपोषणसोडत असल्याचे मुलींनी जाहीर केले. जिल्हा रुग्णालयाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांच्या दडपशाहीमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. माध्यमांच्या प्रतिनिधीचीही मोठ्या प्रमाणात पोलिसांनी हेळसांड केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com