सोलापूर : आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी काढलेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नगर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील 13 हजार 790 तरुणांवर गुन्हे दाखल झाले. आतापर्यंत एकाही तरुणावरील गुन्हा मागे घेण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. दुसरीकडे मात्र बहुतांश तरुणांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर, उच्च शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या तरुणांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाजातील सुमारे 42 जणांनी प्राण दिले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, ती मान्य करण्यात आली नाही. त्यातच न्यायालयात टिकेल असे आरक्षण देऊ, असे म्हणूनही सद्यःस्थितीत आरक्षण न्यायालयात अडकल्याचे चित्रे पाटील यांनी सांगितले. मोर्चावेळी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळातही नोकरीची प्रतीक्षाच आहे. लाखोंचे मोर्चे काढूनही समाजाची घोर निराशा करणाऱ्या सरकारला त्याची किंमत निश्चितपणे मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
समाजाच्या हक्कासाठी काढलेल्या मोर्चावेळी महिला डॉक्टर, वकील, नोकरदारांसह उच्च शिक्षण घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारने आश्वासन देऊनही गुन्हे मागे घेतलेले नाहीत. आता या सर्वांना संबंधित जिल्हा न्यायालयाने 4 एप्रिलला हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे.
- माऊली पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.