मुंबई - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये गुरूदास कामत यांनी जिंकला होता, 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांनी त्यांचा पराभव केला. आता नव्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील कुणाला तरी ही उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. कामत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शोकसभेला त्यांच्या समर्थकांनी विलेपार्ले परिसरात केलेली गर्दी त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक असून कामत यांचा वारसा राजकारणात जपला पाहिजे, अशी मागणी समोर येते आहे.
भाजप शिवसेनेची युती न झाल्यास या परिसरातले वातावरण कॉंग्रेस अनुकूल होईल हे लक्षात घेत उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस नेते राज बब्बर यांनी या मतदारसंघात रस दाखवला आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हेदेखील उत्सुक आहेत. मात्र कामत यांना निरूपम विरोध करीत असे कारण देत विरोधी गट सक्रिय झाला. कामत यांच्या पत्नी महारूख या मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात, तर मुलगा सुनील हा वैद्यकीय व्यवसायात उच्च शिक्षण प्राप्त केलेला युवक आहे. निवडणुकीच्या रिंगणात शिरण्याचा निर्णय घेण्याच्या ते सध्या मन:स्थितीत नाहीत. मात्र कार्यकर्ते आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
|